Saturday, November 15, 2008

ओळख रिसोडशी

जेथे लोकांचे एकमेकांवर खूप प्रेम व विश्वास आहे.
कुणीही कुणाचेही घरी जेथे आधी न कळवता हक्काने जाऊ शकतो.
संत अमरदास बाबांचा जेथील लोकांना सहवास लाभला.
आप्पा स्वामी , सिद्धेश्वर, गजानन महाराज अशी जागृत देवस्थाने जेथे आहेत.
एका कोपऱ्यातील छोटेसे कोपरेश्वर संस्थानही संबंध बेंदरवाडीची जेथे शोभा वाढवते.
पिंगलाक्षी देवी, गोरखनाथ किंवा शिंगाळ्याला जाऊन जेथे लोक जेथे ट्रेकिंग करतात.
जैनांच्या प्राचीन मंदिरात भाद्रपद जेथे साजरा करतात.
जेथे गणेश मंदिरात भल्या पहाटे कुडकुडत भक्तिरसाने ओथंबलेली काकड आरती अबाधीतपणे करतात.
वेगवेगळ्य़ा काळ-ऋतू परत्वे जेथील लोक देवाची उपासना करतात.
जेथे एखादी सीक्रेट गोष्ट वाऱ्यापेक्षाही वेगाने पसरते.
तिरूपतीच्या श्री. बालाजीला गाडी करून दर्शनाला जाण्याची जेथे चढाओढ असते.
जेथे क्रिकेटचा, पोहण्याचा, भुतांच्या गप्पा मारण्याचा, संध्याकाळच्या शेकोटीचा असा एक खास सीझन असतो.
जेथे सर्वांनीच एकाच प्रकारचे वाहन (ट्रॅक्स गामा)खरेदी करण्यात धन्यता मानली जाते.
तारुण्यात पदार्पण करण्यासाठी जेथे जैन पान मंदिर या पानपट्टीवर जाऊन उभे राहावे लागते.
उन्हाळ्यात मध्यरात्री पाणी भरणे, नवरात्रात भल्या पहाटे देवीला जाणे अशा अनेक गोष्टींचे जेथे आगळे महत्त्व आहे.
बाळसमुद्राच्या संबंधीत जेथे अनंत आख्यायिका जेथे ऐकवल्या जातात.
पाऊस पडण्यासाठी जेथे अनेक कर्म-कांडे व भंडारे होतात.
एकाच घरातील दोन उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात जेथे आमनेसामाने उतरतात.
त्या रिसोड गावाशी माझे कायमचे रेशिमबंध आहेत.
रिसोडच्या त्या प्रत्येक गोष्टीचा मी चाहता आहे.
त्या रिसोडच्या अनेकांशी माझे ऋणानुबंध आहेत.
त्याच रिसोडच्या प्रत्येकाशी मला काही तरी देणे लागते!

No comments: