जीवनात असा एखादा प्रसंग घडून जातो की, आपण त्या क्षणी अवाक होतो. आपल्या संवेदना किंवा जाणीवेचा काटा शुन्यावर स्थीर होतो. ती गोष्ट किंवा प्रसंग घडून गेल्यानंतर आपण त्याचे उगाचच विश्लेषण करत बसतो.. त्याचे कोडे उलगडण्याचा निष्फ़ळ प्रयत्न करतो. परंतु त्याला काहीच अर्थ नसतो. काही प्रसंग साधेच घडून जातात. पण ते आपला मनात कुठेतरी खोलवर रुतून बसतात.
असाच एक प्रसंग मला अनुभवावयास मिळाला. मी आणि माझ्या मित्राने कॉलेजचे शेवटचे वर्ष पूर्ण केले होते. निकालही लागला आणि आम्ही बेकारीच्या शीडीवर पहीली पायरी चढली. आता रोज वर्तमानपत्रातील नोकरीच्या संधी व जाहीराती पाहणे आवश्यक होते. रिसोडला सार्वजनीक वाचनालय असल्यामुळे प्रत्येक वर्तमानपत्र दररोज पहाणे एक कठीण समस्याच होती. त्यावर उपाय म्हणजे रामभाऊ पेपरवाले. सर्वजण त्यांना रामभाऊच म्हणत असत. हा रामभाऊ बस स्थानकावर फ़ीरत पेपर विकत असे. तो आम्हाला आम्ही बेरोजगार असल्यामुळे प्रत्यक पेपर जाहीराती बघण्यासाठी अगदी विनामूल्य चाळू देत असे. त्याच्या या चांगुलपणासाठी आम्ही त्याचे नेहमी आभार मानत असू. असा हा रामभाऊ परिस्थितीने व स्वभावाने अतिशय गरीब होता. पण त्याच्यात एक दुर्गुण होता. तो म्हणजे त्याचे तळीराम असणे. तो भयंकर मद्यपी होता. रामभाऊ आणि दारु असे समिकरणच झाले होते. त्याला पैशाची निकड भासली की तो नेहमी मला दारुसाठी पाच रुपये मागत असे. तेंव्हा त्याला मी सांगितले, "रामभाऊ माझ्याजवळ एक पेपर घेण्यासाठी पैसे नाहीत, तेंव्हा तुला मी पाच रुपये कुठुन देणार?" तेंव्हा रामभाऊने ," काही हरकत नाही तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, तुम्हाला जेंव्हा नौकरी लागेल तेंव्हा पाच रुपये नक्की द्याल." असे म्हणून माझ्याकडून त्याने तसे पक्के वचन घेतले. दरम्यान आमचा वर्तमानपत्रातील नोकरीच्या संधी पाहणे, अर्ज करणे, परीक्षा देणे असा नित्यक्रम चालूच होता. सुदैवाने पुढे काही काळानंतर मला नोकरी मिळाली. नंतर नोकरी व इतर व्यापात इतका गर्क झालो की, रामभाऊला व त्याला दिलेल्या वचनाला मी साफ़ विसरून गेलो. असाच एकदा परगावी जाण्यासाठी मी बसस्थानकावर उभा असतांना एकदमच रामभाऊ माझ्या समोर प्रगटला व "बरेच दिवसात दिसला नाही कुठे गावाला वगैरे गेला होता काय?" असे मोठया आस्थेने विचारीत"आज पेपर पहायचे नाही काय?"असे बोलला. रामभाऊ समोर दिसल्या बरोबर मी त्याला दिलेल्या वचनाची एकदमच आठवण झाली. मी खिशातील पाच रुपये काढून त्याचे हाती देत म्हणालो,"रामभाऊ, आता मला नोकरी लागली आहे, आणि माझ्या वचनाप्रमाणे तू हे पाच रुपय घे." त्याने पैसे परत करत म्हटले की मी महीन्यापूर्वीच दारू सोडली. मी आश्चर्याने जवळ जवळ उडालोच. मी त्या आश्चर्याच्या धक्क्यातू सावरत म्हटले रामभाऊ ही तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नंतर मी त्याला आणखी पाच रुपये देऊ केले. परंतू रामभाऊने त्याला साफ़ नकार दिला. व त्याने म्हटले, "मी तुमच्या कडून एक हाफ़ चहाच घेईन, मला फ़क्त पन्नास पैसच द्या." मी यांत्रिकपणे त्याला पन्नास पैसे दिले. तो परत माघारी वळला आणि "पेपर... पेपर..."करीत गर्दीत दिसेनासा झाला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अवाक होऊन बघतच राहीलो...
लेखक: रावसाहेब देशपांडे.
रावसाहेब उर्फ़ विजय देशपांडे सध्या रिसोडलाच स्थित असून ते सध्या महागांव-बाळ्खेडा इत्यादी ग्रामिण परीसराचे पटवारी आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या "आदर्श पटवारी " पुरस्काराचे मानकरी आहेत आणि निष्ठावान व कार्यकुशल कर्मचारी आहेत.
या अनुभव लेखनातील रामभाऊ पेपरवाला हे "आर. के" या नावाने रिसोडला १९८० ते २००० या काळात प्रसिद्ध होते. पांढरे कपडे, वर्ण काळा, शिडशिडीत बांधा, कुरळे (काळे/पांढरे) केस, भिंगाचा चष्मा व डाव्या हातात पेपरांचा गठ्ठा असा त्यांचा वेश होता.
No comments:
Post a Comment