Tuesday, March 31, 2009

पार्डी (तिखे) येथील जागृत श्री. गणपती देवस्थान


पार्डी तिखे हे छोटेसे गाव ता. रिसोड जि. वाशीम येथे आहे. वाशीम रिसोड मार्गावरील आसेगांव पेन पासून उत्तरेस साधारण
४ किमी व शिरपूर जैन पासून दक्षिणेस अंदाजे १२ किमी अंतरावर आहे. या गावाच्या लगतच गावखरी शेतात गणपतीचे छोटे जुने मंदीर आहे. गणपतीची मुर्ती पाषाणाची असून गणपती उजव्या सोंडेचे आहेत. पूर्वाभीमुख असणारी शंदूर लावलेली गणशाची मुर्ती अतीशय मोहक आहे. सदर्हू देवस्थान देशपांडे घराण्याचे परंपरागत मालकीचे व खाजगी आहे. या मुर्तीची स्थापना १५० वर्षापूर्वी झालेली आहे. या देवळाचे संस्थापक कै. श्री बळवंतराव देशपांडे यांनी ही पाषाणाची मुर्ती स्थापन करून हे देऊळ बांधले व येथे ते गणपतीची भक्ती व आराधना करू लागले. यापूर्वी कै. बळवंतराव सरकारी हुद्यावर कार्यरत होते. ती नौकरी सोडून ते पार्डीस आले व श्री. गणेशाची स्थापना करून त्यांनी आराधनेस सुरूवात केली.
बळवंतरावांना तीन पुत्र होते. भालचंद्र, मुद्गल व हरिशचंद्र. पैकी मुद्गल हा अवतारच होता. तो आपल्या स्वस्थानि तिघुन गेला. भालचंद्र हे पिता-पुत्र गुरुशिष्य होते. बळवंतांनी आपला पुत्र भालचंद्र याला परिपुर्ण केले. त्यांनीही गणपतीची भक्ती करून गणपतीला प्रसन्न केले. वरील दोघेही पितापुत्रांचा शिष्य परिवार होता. बळवंतराव समाधिस्त झाल्यावर भालचंद्र यांनी भक्ती साधना सुरूच ठेवली. भालचंद्र यांनी शके १८२२ मध्ये गणपतीची पार्थीव मुर्ति हातात घेऊन जीवंत समाधी घेतली. त्यांचे पट्टशिष्य श्री. भगवंत गुरूजी जे वाशीमचे झिंगरी जोशी म्हणून ओळखले जातात त्यांनी गणपतीची २१ अध्यायी श्री सद्गुरु लीलामृत या नावाने पोथी लिहीली. त्यांची समाधी वाशीमच्या पद्मतीर्थावर आहे व त्यांचा मठ आर्वी जि. वर्धा येथे आहे.

याप्रमाणे पार्डीच्या मंदिराच्या परिसरातील भूमी परम पवित्र असून तपोभूमी आहे. जे भावीक दर्शनाला येतील, आपली मनोकामना व्यक्त करतील त्यांची ती इच्छा पूर्ण होते असा अनुभव अनेकांना आला आहे.
न लागता कष्ट सायास। कामना पूरति पार्डीक्षेत्रास॥
पार्डीच्या ह्या गणपतीची अष्टविनायकाच्या मालिकेत गणना नसली तरी याचे महत्व तेवढेच आहे. आजही १०-१२ वर्षापासुन हजारो भावीक भक्तगण संकष्टी चथुर्थीला येथे दर्शनास येतात. सकाळी ६ पासून ते रात्री १० पर्यंत दर्शनार्थींची गर्दी असते. त्या दिवशी एखाद्या यात्रेसारखे स्वरूप पहावयास मिळते.येथे लोकांनी पाण्याची व्यवस्था केली आहे. निवास, स्वयंपाक-पाकगृह, भांडीकुंडी अशा सर्व व्यवस्था तेथे केल्या आहेत. येथिल परिसर रमणीय आहे. या परिसयाची जवळ जवळ एक एकर जमिन चारही बाजूला कुंपणाने सुरक्षित केली आहे. याच परिसरात एक विहीर आहे. त्यात नर्मदा प्रगट झाली आहे असा भक्तांचा दृढ विश्वास आहे. हे संस्थान पार्डीकर देशपाण्डे घराण्याचे खाजगी मालकीचे आहे. सध्या संस्थान्चे कारभार व व्यवस्थापन श्री. पद्माकर देशपांडे, परभणी व श्री प्रभाकरराव देशपांडे, रिसोड हे पाहतात.

संग्राहक- प्रभाकर देशपांडे पार्डीकर, रिसोड (०७२५१-२२२६९०)